
बाकीच्यांनी कितीतरी थकवले त्यांचे काय?
लोकमतने सुरु केलेल्या ‘सहकार की स्वाहाकार’ या मालिकेचा दुसरा भाग प्रकाशित झाला आणि राज्यभर एकच खळबळ उडाली. ज्या कारखान्यांची रक्कम आऊटस्टँडींग आहे त्याची यादीच प्रकाशित झाल्याने त्या त्या कारखान्यांच्या एमडींनी आमचे एक रुपया देखील थकीत नाही, तुम्ही कशाच्या आधारे हे छापले, जे छापले ते चुकीचे आहे, तुमच्याकडे काय आधार आहे ते आम्हाला फॅक्स करा इथपासून ते नाबार्डवाल्यांना काय कळतंय इथपर्यंतच्या प्रतिक्रिया उमटल्या. विधानभवनात राष्टÑवादीच्या अनेक आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली व त्यांना याबद्दल काहीतरी करा अशी मागणी लावून धरली. उपमुख्यमंत्र्यांनी देखील प्रस्तूत प्रतिनिधीला फोन करुन बोलावून घेतले आणि ‘काय छापले आहे’ अशी विचारणा केली. त्यावर त्यांच्यासमोर नाबार्डचा अहवालच ठेवला त्यावेळी मात्र त्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अनेक आमदार त्याहीवेळी आपलेच मत कसे बरोबर आहे हे दादांना पटवून देत होते त्यावर त्यांनाच दादा म्हणाले, यांना कशाला बोलता, नाबार्डने दिले ते यांनी छापले आहे. नाबार्डला बोला काय बोलायचे ते… काहींनी तर आमच्या कारखान्याचे नावच नाही इथपासून सुरुवात केली. तर काहींनी आमचे तर कमी पैसे थकलेत, ज्यांचे याहीपेक्षा जास्त पैसे थकलेत त्यांची नावे छापा अशी मागणी केली आहे. राज्य सहकारी बँकेचे पीआरओ विकास पवार यांनी फोनवर संपर्क साधला व ते म्हणाले, आमच्या अध्यक्षांनी, माणिकराव पाटील यांनी योग्य ते छापा असे सांगितल्याचा निरोप दिला. तर बँकेचे एमडी प्रमोद कर्नाड यांनी आपण खुलासा दिला पाहिजे असे सांगितले पण पीआरओंनी दादांनी अहवाल पाहिला व काहीच प्रतिक्रिया दिली नाही असे सांगितल्यावर त्यांनीही काहीच मत दिले नाही असे पीआरओ म्हणाले. एकूणच या वृत्तमालिकेने राज्यभर खळबळ उडाली होती.
Comments